सुहास

संगणकामुळे बऱ्याचजणांचे आयुष्य बदलले. चांगले - वाईट परिणाम झाले. त्याचे एक उदाहरण. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यांमुळे काही तांत्रिक शब्द आठवत नाहीत.

 नोकरीला दोन-तीन महिने झाले होते. एका रविवारी सुहास घरी आला. मी नोकरीला लागल्याबद्दल माझे अभिनंदन केले. नोकरीसंदर्भात चौकशी केली.

थोडावेळ शांत बसल्यावर हसून म्हणाला "या कॉम्प्युटरने माझं खूप नुकसान केलंय. जवळ-जवळ आयुष्य उद्ध्वस्त केलंय म्हटलं तरी चालेल. त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो, वेळ होता म्हणून टायपिंगचा क्लास लावला होता. क्लासमध्ये सरांशी ओळख वाढली. त्या क्लासमध्ये टाईपरायटर दुरुस्तीची कामे केली जात होती. नंतर कळलं की त्यांचं बऱ्याच मोठं-मोठ्या कंपन्यांबरोबर दुरुस्ती आणि देखभालीच काँट्रॅक्ट आहे. बऱ्यापैकी पैसा होता. या क्षेत्रात खूप कमी माणसं होती. म्हणून या क्षेत्रात झोकून द्यायचं ठरवलं.

कॉलेज करून नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी करून कॉलेज करायचं ठरवलं. घरच्यांचा विरोध होता, पण माझ्यापुढे त्याचं काही चाललं नाही. पास होण्यापुरते मार्क मिळवायचे आणि मन लावून काम करायचो. काम खूप होतं, त्यामानाने पगार खूपच कमी होता. मला पगाराची काही पर्वा नव्हती. आपण याला शिकवून उपकार करतोय असं सरांना वाटत होतं.

कॉलेज पूर्णं झालं की स्वतःची छोटीशी कंपनी टाकायची ठरवले होते. जिथे दुरुस्तीच काम करायचो तिथं ओळखी वाढवून ठेवल्या होत्या. पुढे उपयोगी पडतील म्हणून. कॉलेज फक्त नावाला होतं. परीक्षेच्या १०-१५ दिवस आधी सुट्टी घेऊन अभ्यास करायचा आणि पास होण्यापुरते मार्क मिळावयाचे हे ठरलेलं.

कॉलेज संपलं आणि त्याच वेळेस भारतात संगणक युग अवतरलं. जिथे शेकड्यांनी टाइपरायटर्स दिवसभर चालायचे तिथे कॉम्प्युटरमुळे मिनिटात कामे होवू लागली. मी मात्र… म्हणजे वेड लागायची पाळी आली…कारण पुढचं भविष्य दिसू लागलं होतं. आज नाही पण वर्षभरात माझं काम पूर्णपणे बंद होणार होतं. ज्याच्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. हात जाळून घेतले** त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता.

परीक्षेत किती मार्क मिळणार ते मला माहीत होते. त्याच वेळेस घरी अशी परिस्थिती निर्माण झाली की घराचा सारा भार माझ्यावर आला. म्हणजे आता मिळेल ती नोकरी करून माझे आणि घरच्यांचे पोट मला भरायचे होते.

मनाने इतका खचलो की विचारू नको, कॉम्पुटर म्हटलं की उगाच एक दडपण येतं मला."

त्यावेळेस सुहास Door To Door Marketing करत होता.

——————

**अक्षर पुसट आली किंवा खराब झाली की ते अक्षर बदलावं लागत. त्यासाठी ते तापवून जोड द्यावी लागते. किंवा असच काहीतरी नीटस आठवत नाही.

मी आणि गाढवं - ३

कोल्हापुराला निवड झाली असा कमलेशचा मेसेज आला. रविवारी संध्याकाळी तो घरी भेटायला आला.

काय रे कधी चाललाय कोल्हापुराला?

-वेळ आहे अजून, एक-दीड महिना तरी लागेल.

तू तर निवड झाली म्हणून SMS पाठवला होता.

- तसं confirm आहे. पण कॉल लेटर आल्यावर join होणार. आणि कॉल लेटरला एक-दीड महिना तरी लागेल.

कोल्हापूर म्हणजे बरंच लांब होतंय. जवळपास बघायचं ना.

-तसं ठाण्याला पण जागा आहेत. भिवंडीला पण आहेत. आणि पुण्याला कालच जाऊन आलोय.

मग ठाणे किंवा भिवंडी जवळ पडेल तिकडे try कर, कोल्हापुराला कशाला चाललाय.

- अरे interview देऊन ठेवतो, कधी काय होईल ते माहीत नाही.

का?

-भिवंडीला आणि कोल्हापुराला stay आणलाय.

भिवंडीला stay? कशासाठी?

- तिकडे त्यांना मुसलमान लोकांची भरती करायची. 

अरे पण असा stay कसा आणता येईल. शक्य नाही.

- सगळं possible आहे. जाम लफडी असतात रे, सगळं पॉलिटिक्स आहे.

नाही असा stay शक्य नाही, कोर्टात अशी केस उभी राहूच शकत नाही.

- एकदा कोर्टात गेलं की त्याला २-३ वर्षे लागतील, मग आम्ही लटकलो ना, म्हणून मी सगळीकडे interview देऊन येतोय.

 आणि कोल्हापुराला काय झालं?

- तिकडेपण नगरसेवकाने असाच stay आणलाय.

म्हणजे?

- स्थानिक लोकांना भरती करायचं म्हणून.

हां बरोबर आहे त्यांचं. अरे म्हणजे भिवंडीलापण असाच stay असला पाहिजे.

- हो पण तिकडे स्थानिक म्हणजे सगळे मुसलमानच ना.

पण तू ज्यापध्दतीने सांगितलं त्यामुळे काही भलताच अर्थ निघतो ना. मला वाटलं फक्त मुसलमान लोकांना घ्यायचंय म्हणून stay order आणलीय.

- अरे पण ते understood आहे ना. तिकडे स्थानिक काय अन मुसलमान काय एकच.

मला माझ्या वैचारिक मागासलेपणाची कीव आली.