मंदिर आणि गाढव

पुतळे दंगली घडवू शकतात हे सरकारला पटल्यामुळे शेवटी सरकाराने पुतळ्यांवर बंदी आणली. आधी उभारलेल्या पुतळ्यांचे विसर्जन करण्याचे ठरले.

गाढव समाजासाठी गाढवतोड मेहनत केलेल्या एका गाढव नेत्याचे एक मंदिर चौकातच होते. दुसऱ्याच चौकात त्याच नेत्याचा एक सुंदर पुतळा उभारलेला होता. पुतळा जाणार हे कळल्यावर सर्व गाढवसमाजाने हळहळ व्यक्त केली.

मंदिरातले गाढव मात्र खुशीतच होते. पुतळ्याला शेवटच छळावं या उदात्त हेतूने मंदिराच्या कळसावर चढून पुतळ्याशी गप्पा मारू लागलं.

"काय मग. जायचं ठरलं का?"
"बरं झालं ते एकदाचं. सुटलो एकदाचा. ते पक्षी, ते ऊन-वारा-पाऊस, ती माणसं, ते बोलणं, काहीही कुणीही उठून यावं, नको त्या अवयवाला हात लावावा छीः"
"हा तेदेखील बरोबरच आहे. सगळीच द्राक्ष आंबट असतात का हो?"
"द्राक्षांच काही माहीत नाही. पण सरकारच मात्र कळत नाही. आता आम्ही जाणार म्हटल्यावर दंगलकर्त्याची भूमिका तुम्हाला पाहावी लागणार."
"म्हणजे?"
"आता बघा पुतळे सॉफ्ट टार्गेट म्हणून आमच्या नावाने दंगल-दंगल खेळायचे. आता आम्ही नाहीत म्हणून ते खेळायचे थांबणार आहेत का?"

आपल्यावर कोसळलेल्या नवीन संकटामुळे आपलं मंदिर जाणार या भितीची पाल मंदिरातल्या गाढवाच्या मनात चुकचुकली.