गाढव आणि अर्थशास्त्र - १

शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी या हेतूने कॉम्प्युटर क्लास लावला. जॉब गॅरंटी देणारा एक महागडा क्लास मित्राच्या मदतीने शोधला, पैसे भरले. क्लास सुरू झाला, संपला. नोकरी मिळाली. नंतर क्लासचा आणि माझा संबंध संपला. पुढे माझ्या गुणवत्तेच्या(?) जोरावर पुढे आलो. नव्या नोकऱ्या, चांगल्या कंपन्या, चांगला पगार सारं सहज जमत गेलं.

आज मी भोवतालाची माणसं बघतो तेंव्हा काहीतरी चुकतंय अस वाटतं. कुठेतरी नक्की चूक होतेय.

बहुतेक सहकारी सधन कुटुंबातील आहेत. इथेच काहीतरी चूक होतेय. सारे सधन कुटुंबातील कसे असू शकतात?

गणित सोपं होत. माझ्या क्लासमधील विद्यार्थीदेखील सधन कुटुंबातील होते. महागडा क्लास लावण्याचे कारण म्हणजे, नोकरीची हमी आणि पुरेसा पैसा असणारे पालक.

बरं मी ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे कर्मचाऱ्यांची मागणी जास्त तर पुरवठा कमी आहे. मोठ्या पगाराची नोकरी मिळाली की लगेच नोकरी सोडायची हे ठरलेलं. काम नसलं की कामगार कपात हे कंपन्यांचं ठरलेलं.
नवीन माणसं ओळखीद्वारे निवडली जातात. ओळखीचं कोणी नसेल तर www.jobs.com सारख्या साईट आहेतच मदतीला. बहुतेक ठीकांनी "नोकरीसाठी जाहीरात" हा शेवटचा पर्याय असतो.

बरेचदा असं दिसून येतं की नवीन माणूस अपेक्षेप्रमाणे काम करत नाही. बऱ्याचदा "ढ" म्हणावं अशी माणसे असतात. कामावरून कमी करण्यापेक्षा copy & paste प्रकारात मोडली जाणारी कामे त्याला दिली जातात.
बहुतेक ठिकाणी अशीच माणसे जास्त असतात. दोन-चार हुशार/कुशल कर्मचाऱ्यांना मनासारखा पगार देऊन त्यांच्या हाताखाली अशी copy & paste करणाऱ्यांची टीम असते. स्वस्तात काम होतं. स्वस्तात म्हणजे इतर कर्मचाऱ्यांच्या मानाने कमी परंतू उच्च मध्यमवर्ग म्हणतात एव्हढा.

BE/MCA अशा उच्चशिक्षितांप्रमाणेच अनुभवी/कुशल कर्मचाऱ्याला मान दिला जातो. पैसाही. एकदा कामावर आला की या पदव्यांचा उपयोग शून्य असतो. तिथे तुमच्या पदवीपेक्षा तुम्ही काम कसं करता याला महत्त्व दिले जाते. माझ्या माहितीतले बरेचसे BE/MCA "ढ" वर्गातले आहेत त्यांचा उपयोग copy & paste साठीच केला जातो.

इथे मला गणित उमगलं.
पैसेवाले पालक = महागडा क्लास = नोकरीची हमी = चांगला पगार
पुढे लग्नदेखील नोकरी पाहून केले जाते. म्हणजे नोकरी करणारी मुलगीच पाहीजे. आणि परत,
पैसेवाले पालक = महागडा क्लास = नोकरीची हमी = चांगला पगार

मंदिर आणि गाढव

पुतळे दंगली घडवू शकतात हे सरकारला पटल्यामुळे शेवटी सरकाराने पुतळ्यांवर बंदी आणली. आधी उभारलेल्या पुतळ्यांचे विसर्जन करण्याचे ठरले.

गाढव समाजासाठी गाढवतोड मेहनत केलेल्या एका गाढव नेत्याचे एक मंदिर चौकातच होते. दुसऱ्याच चौकात त्याच नेत्याचा एक सुंदर पुतळा उभारलेला होता. पुतळा जाणार हे कळल्यावर सर्व गाढवसमाजाने हळहळ व्यक्त केली.

मंदिरातले गाढव मात्र खुशीतच होते. पुतळ्याला शेवटच छळावं या उदात्त हेतूने मंदिराच्या कळसावर चढून पुतळ्याशी गप्पा मारू लागलं.

"काय मग. जायचं ठरलं का?"
"बरं झालं ते एकदाचं. सुटलो एकदाचा. ते पक्षी, ते ऊन-वारा-पाऊस, ती माणसं, ते बोलणं, काहीही कुणीही उठून यावं, नको त्या अवयवाला हात लावावा छीः"
"हा तेदेखील बरोबरच आहे. सगळीच द्राक्ष आंबट असतात का हो?"
"द्राक्षांच काही माहीत नाही. पण सरकारच मात्र कळत नाही. आता आम्ही जाणार म्हटल्यावर दंगलकर्त्याची भूमिका तुम्हाला पाहावी लागणार."
"म्हणजे?"
"आता बघा पुतळे सॉफ्ट टार्गेट म्हणून आमच्या नावाने दंगल-दंगल खेळायचे. आता आम्ही नाहीत म्हणून ते खेळायचे थांबणार आहेत का?"

आपल्यावर कोसळलेल्या नवीन संकटामुळे आपलं मंदिर जाणार या भितीची पाल मंदिरातल्या गाढवाच्या मनात चुकचुकली.

बॉम्बस्फोट आणि गाढव

आज दिनांक १२/०७/२००६. सकाळी गाढवाप्रमाणे उठलो. गाढवलेली कामे केली. TVवर मस्तपैकी कालच्या बॉम्बस्फोटाची चित्रे पाहिली. पोलीस, अतिरेकी, सोनिया, लालू, देशमुख, काँग्रेस, मुस्लिम आणि माहीत असलेल्या सर्वांना मनसोक्त गाढव शिव्या दिल्या.

८.२४ ची लोकल पकडली आणि ग्रुपमधील सगळ्यांनी मिळून शिव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. भिवंडी, काश्मीर, ISI, सिमी अशा बहुतेकांचे संबंध बॉम्बस्फोटाशी जोडले.

गाड्या स्लो असल्यामुळे उशीर झाला. लेटमार्क लागलाच आहे तर इराण्याच्या हॉटेलमध्ये मस्का पाव-चहा घेतला, दोघांनी खिमा-पाव घेतल्यामुळे थोडा तिकडेपण हात मारावा लागला.
ऑफिसमध्ये मेल चेक केल्यावर वेगवेगळ्या ब्लॉग आणि फोरम मध्ये शिव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. चहा नंतर कामाला सुरुवात करणार केली. आता बहुतेक LUNCH मध्ये आणि संध्याकाळी लोकलमध्ये शिव्या देण्याचा कार्यक्रम करणार.

या भडव्यांना अद्दल घडवलीच पाहिजे.

हिरवे साप फार चेकाळलेत, बघूया भगवे बेडूक किती उड्या मारतात.
च्याआयला बंद नको नाहीतर रविवारी कामावर यावे लागेल.

सोनू

अंधेरी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स या तथाकथित सुशिक्षित, उच्चभ्रू वसाहतीने घेतलेला एक बळी उघडकीस आला.
१० वर्षाच्या सोनूला लिपस्टिक लावली म्हणून ठार मारण्यात आले. महिना ८०० रु. पगार होता तिला.
सोनूला मारताना क्रूरपणाचा कळस गाठला. गुप्तांगात मिरची आणि aluminium rod घालून मारण्यात आले.

सोनूला मारण्याची हि पहिलीच वेळ असेल का?
१० वर्षाच्या मुलीला कामावर ठेवले होते हे कॉम्प्लेक्समधील इतरांना माहीत नव्हते का?
आणखी अशा किती सोनू तिथे आहेत?
या कॉम्प्लेक्समधील हा नक्की पहिला बळी होता का?

राखी आणि मीकासारखी प्रसिद्धी नसलेल्या सोनूला प्रसारमाध्यमांनी थोडा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

http://www.dnaindia.com/report.asp?NewsID=1038828

गाढवप्रश्न - १

या गाढव समाजात वावरताना मला बरेचदा काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

आपण का जगतो? इतर प्राणी, झाडे, पक्षी का जगतात?
बरे फक्त जगतच नाही तर नवीन जीवांना जन्मदेखील देतो.
इतरांच ठीक आहे निसर्गानं आखून दिलेल्या रस्त्याने जायचं, जगायचं - मरायचं.

आपण मात्र संस्कृतीच्या नावाखाली स्वतःला नको तो त्रास देत असतो. उगाचच सु-संस्कृत असल्याचा दिखावा करतो.
नर-मादी हे साध सरळ नात सोडून आपण नवी नाती तयार केली. त्यांच्या जंजाळात अडकलो. कशासाठी?

योग्य त्या वयात प्रणयक्रिडा करणे आपण सोडून दिले. आता तर लग्नाचे वय विनाकारण वाढवले. कशासाठी?
तर बदललेली संस्कृती.. मग आपल्या भावनांना इतर मार्गाने वाट करून द्यायची. मैथुनासारखे प्रकार त्यातलेच.

कशासाठी हे सगळं?

बरं विवाहपूर्व संबंधांना तथाकथित संस्कृती रक्षकांचा विरोध. का?
जर शारीरिक गरजा योग्य त्या वेळेस दोघांच्या अनुमतीने भागवल्या तर हरकत कशाला?
१८-२१ वर्षावरील मुलं जर लग्नाचे निर्णय घेऊ शकतात तर विवाहपूर्व संबंधांना कायदेशीर मान्यता का नको?.

संस्कृतीच्या नावाखाली निसर्गाशी वैर कशाला?

आज्जा

माझ्या आज्ज्याला मी नोकरीला जाण्याचा भारी अभिमान होता.
आमच्या पूर्णं खानदानात १५वी शिकलेला मी एकटाच होतो, त्यात नोकरी म्हणजे "सोनेपे सुहागा".
त्याच्या मित्र मंडळीत तो हि गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगायचा.

पण मी कामाला जातो आणि तिथे काम काय करतो हि गोष्ट त्याला शेवटपर्यंत समजली नाही.
मी बऱ्याच वेळा माझ्या परीने प्रयत्न केला पण त्याला काही समजले नाही.
दर दोन-चार आठवड्याने मला माझ्या नोकरीबद्दल प्रश्न विचारायचा.

काम कसं चाललंय?
- चांगलं चाललंय.
अंग मेहनतीच काम असतंय का?
- नाही. बसून असतो दिवसभर. सकाळी खुर्चीवर बसलं की संध्याकाळीच उठायचं.
पाठ दुखतं असलं नाय का?
- हा. होतो त्रास.
मग मधी-मधी उभं ऱ्हायचं. भायेर फिरून यायचं. भायेर जाउ देत्यात का?
- हो.
मोठं-मोठ्या मशनी हायेत का?
- नाय.
मग लीखापढीचं काम हाय का?
- नाय.
मग?
- कॉम्पुटरचं काम आहे.
म्हंजे?

आता संगणक म्हणजे काय? तो कसा असतो? आणि काम कसे केले जाते हे मला कधीच समजावून सांगता आले नाही. तरीही मी माझ्या परीने प्रयत्न करायचो. आज्ज्याला टाईपरायटर माहीत होता. बहुतेक कोर्ट-कचेरीमध्ये बघितला असावा.

- टायपिंग करतात ना तशी मशीन असते. 
लय टाइप करावं लागतं का? बोटं दुखतं आसतील ना?
- नाय. जास्त टाइप करावं नाय लागत.
मोठी कंपनी हाय का?
- नाही. लहान आहे. १०-१५ माणसं आहेत.
आन माल वाहून न्यायला येगळी माणसं असत्यात का?
- नाही माल-बील काही तयार होत नाही आमच्या कंपनीत.
मग कंपनी करती काय? (उत्पादन कशाच होत?)
- आम्ही कॉम्पुटरवर काम करतो आणि कॉम्पुटरवरच पाठवतो. नाहीतर CD बनवून पाठवतो.

Upload - download करायचं म्हणजे काय? त्या भानगडीत मी पडत नसे. CD म्हणजे जुन्या ग्रामोफोनच्या तबकड्या. समजायला सोप्या होत्या.

त्याच्यात गाणी असत्यात का?
- नाय. त्याच्यात आम्ही केलेलं काम असत.
दररोज माल जातो का?
- नाही काम झालं की जातो.

अस काही ठरावीक दिवसांच्या अंतराने आमचं संभाषण चाले.
कंपनी म्हटलं की एखादा कारखाना ज्यात काहीतरी उत्पादन होत, जे एखादा ट्रक किंवा तत्सम वाहनाने इच्छित स्थळी पोहचवले जाते असा समज असलेल्या माझ्या आज्ज्याला मी काम काय करतो हे शेवटपर्यंत कळले नाही.

मानसशास्त्र - १

झोपडपट्टीतल्या गल्लीत शेवटच्या टोकाला आमचे घर, समोर गुप्ता आणि दोन-चार घरे सोडल्यावर बांगडीवाल्याचे घर.
बांगडीवाल्याने नवीन "टेप रेकॉर्डर" घेतला होता.
मिळेल त्या वेळेस नव्या-जुन्या हिंदी गाण्याचा आस्वाद त्याचे घर घेत होते.
आजू-बाजूच्या २०-२५ घरांना पुरेल एव्हढ्या किंवा शक्य तेव्हढ्या मोठ्या आवाजात तो हजार - दीड हजाराचा टेप जीव ओतून गाणी गात असे.
बऱ्याचदा त्या मोठ्या आवाजाचा त्रास व्हायचा.
बांगडीवाल्याची मुलगी सलमा.
तिला आवाज कमी करण्याची विनंती करावी लागे.
खरे नाव सलिमुन्नीसा.

एकदा बाहेर तिच्याशी गप्पा मारत होतो.
सहजच "टेप रेकॉर्डर" विषय निघाला.
गुप्तांच्या घराकडे पाहून म्हणाली,
"बहोत कंजूष है ये लोग, १०-१२ हजार का टेप लिया है लेकीन इतना बारीक आवाज करके सुनते है की किसीको सुनाई न दे.
अब आवाज बढाने से इनका क्या जायेगा?
सिर्फ घरवाले लोग सुनते है, इतना बिजली बचाके बिल तो उतनाही आता है ना.
अभी जीसके पास टेप नही वो क्या करेगा?
हम लोग देखा ना कैसा फूल आवाज मे गाना सुनते है.
हम भी सुनते है और सबको सुनाते है."

मला गुप्ताच्या कंजूषपणाचा जाम राग आला.

मी आणि गाढवं - २

माझ्या अज्ञानाचा फायदा घेत राहुलने मला इतिहासाचे धडे देण्याचा प्रयत्न केला. 

"हिंदू धर्मात मंदिर बांधण्याची प्रथा नव्हतीच मूळी. बौद्ध आणि जैन धर्माच्या अस्तानंतर ही प्रथा सुरू झाली. अत्यंत अमानुषपणे त्यांच्या कत्तली करण्यात आल्या त्यांची प्राथनास्थळे पाडून तिथे मंदिरे बांधण्यात आली. जिथे "पाडण्यासारखी" गोष्ट शक्य नव्हती तिथे सरळसरळ हिंदू देवतांची स्थापना केली गेली. लेणी, गुंफा बघ. बौद्ध लेण्यात हिंदू देवता सुखाने नांदताना दिसतात."

"पुढे मुसलमान आले. त्यांनी मंदिरे पाडून मशीदी बांधल्या. हे होणारच होते त्यावेळेस राजेशाही होती ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने जग चालते.
पण आता काय? लोकशाहीत आपण मशीदी पाडतोय,
बाबरी पाडली……मंदिर होतं म्हणून….पाडूद्या.
ताजमहालही पाडू…..

आणि कोणी म्हणालं, मंदिराखाली बौद्ध, जैन किंवा द्रविड मंदिर होत तर…… तर काय करणार?

ते जाऊदे… ज्या बौद्ध, जैन लेण्यामध्ये मंदिरं आहेत, जिथं काही उकरायची गरज नाही, त्याचं काय?"

माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहुल विजयी मुद्रेने निघून गेला.